विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी एकनिष्ठ राहिले पाहिजे-
अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके
केज प्रतिनिधी:
– जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशराव इंगळे अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण मंडळ तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती केज, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. चेतनाताई तिडके या उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. वसुदेव नेहरकर उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती केज, संस्थेचे सचिव गिन्यानदेव गदळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रबोधकांत समुद्रे यांनी शब्द सुमणे अंत करणे’ हे गीत गाऊन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव गिन्यानदेव गदळे यांनी दिला याप्रसंगी ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध आव्हानांना सामोरे जाताना कोणत्याही मोहाला बळी न पडता ध्येयाकडे वाटचाल करावी.
पुढे दहावीतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, याप्रसंगी त्यांनी शिक्षकाप्रती आभार सुमने मांडताना आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चेतना तिडके याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, शाळेच्या पहिल्या दिवशी आईचे बोट धरून शाळेत न जाण्यासाठी आपण रडतो, आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी शाळा न सोडण्यासाठी रडतो. शालेय जीवनातून आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात करत असतो परंतु जीवनामध्ये ध्येय प्राप्तीसाठी आपण एकनिष्ठ राहिले पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर प्रत्येकाला स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण कराव लागेल. ‘वाचनानेच सामर्थ्य मिळत’ तेंव्हा अभ्यासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
डॉ. वसुदेव नेहरकर याप्रसंगी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण घ्यावे. या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. तेंव्हा ही शाळा गुणवत्तेसाठी नामांकित असणाऱ्या मराठवाड्यातील अग्रगण्य शाळेपैकी एक शाळा आहे.
अध्यक्षीय समारोपात अंकुशराव इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण घेऊन आपल्या शाळेचे नावलौकिक करावे. शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे फळ, तुमच्या गुणवत्तेतून दिसून यावेत ही अपेक्षा आहे.
याप्रसंगी संघर्ष पत्रकार संघ केज आयोजित तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील इयत्ता सहावी अ मधील विद्यार्थिनींनी शेतकरी नृत्य सादर करून या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक [ सन्मानचिन्ह व ५५५५ रुपये रोख ] पटकाविले, तसेच इयत्ता नववी अ मधील विद्यार्थिनी अक्षरा येडे हिने वैयक्तिक नृत्यांमध्ये द्वितीय पारितोषिक [ सन्मानचिन्ह व ३३३३ रुपये रोख ] पटकाविले, त्याबद्दल विद्यार्थ्यासह मार्गदर्शक प्रबोधकांत समुद्रे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकरी लोकगीत कुर्या चालल्या रानात नृत्यातील सहभागी विद्यार्थी प्राची ढोबळे, अपूर्वा सोनवणे, श्रावणी लोंढे, श्रेया धपाटे, संस्कृती गायकवाड, तेजस्विनी कापरे, सृष्टी अडसूळ, राजनंदिनी सोनवणे, श्रद्धा काकडे, श्रुती सावंत, किशोरी मुळे, नंदिनी सपाटे आदी.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार अजय देशपांडे सर यांनी मानले याप्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करताना यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.