आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी व्हावा – प्रा. डॉ. अर्चना वाघमारे
केज दि २०(प्रतिनिधी)
बदलती जीवनशैली, वाढलेला भौतिक सुविधांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मानवी जीवन आज सर्वोच्च उंचीवर आहे. त्याचबरोबर आज भारतासहसंबंध जगात पर्यावरण प्रदूषणाची समस्या ही अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये पोचली आहे. त्यामुळे सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा .डॉ. अर्चना वाघमारे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय, केज येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 14 जानेवारी भूगोल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम पाटील तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी ग्लोबचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष समारोप प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध पर्यावरण हे वर्तमानाची गरज असून भविष्याची ती मागणी आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण चांगले पर्यावरण देणे हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. अपेक्षा ठोंबरे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. नागेश कराळे तर आभार कु. प्रतीक्षा ठोंबरे हीने मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.