सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांना कठोर शासन करा
गौतम बचुटे/केज :- परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याशी संबंधित सर्व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे. यासाठी केज येथे सर्व दलित संघटनांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
या बाबतची माहिती अशी की, परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या जमावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ केज तालुक्यातील सर्व दलित संघटनांनी पक्षांनी एकत्र येत आज दि. १८ डिसेंबर रोजी केज येथील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हातात निषेधाचे फलक आणि सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाण आणि अत्याचाराचे फलक हातात घेवून तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
मोर्चातील कार्यकर्ते आक्रमक होते. त्यांनी पोलीस प्रशासन, सरकार आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध प्रचंड आक्रोश करून त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा हा मंगळवार पेठ, मेन रोड आणि छ्त्रपती शिवाजी चौकातून तहसीलवर धडकला. या यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांचे निवेदन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारले.