स्व. विमलताई मुंदडा यांच्या नंतर मुंदडा कुटुंबाचे केज शहराकडे दुर्लक्ष
अनेक प्रश्न जैसे थे..!
नागरिकांत चर्चा
केज –
सर्वात जास्त निधी आणुन आपण मतदारसंघाचा विकास केला आहे. असे ठामपणे आ. नमिताताई मुंदडा व त्यांचे सहकारी सांगत आहेत मात्र सर्व विकासात केज शहराचा विकासाचा जो आलेख उंचावला पाहीजे होता तो जैसे थे आहे.
स्व. विमलताई मुंदडा या आमदार व मंत्री पदापर्यंत पोहचल्या त्यांनी केज व तालुक्यात अनेक भरीव कामे केली त्यांची आजपण आठवण येते.
मात्र यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघाला नेमके काय मिळाले ? हे मात्र अद्यापही दिसून येत नाही. त्यामुळे विद्यमान आमदार जरी विकास केल्याचा डंका पिटत असतील तरीही केज विधानसभा मतदारसंघ हा मागच्या कित्येक वर्षांपासून आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे. म्हणावे तसे भरीव काम अद्याप झालेले नाही.
स्व. विमलताई मुंदडा यांच्या नंतर मुंदडा कुटुंबाचे केज शहराकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
अनेक प्रश्न जैसे थे!
केज विधानसभा मतदारसंघावर मागच्या कित्येक वर्षांपासून मुंदडा कुटुंबीयाकडे आहे.
स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यानंतर पोट निवडणूक वगळता त्याच कुटुंबाकडे सत्ता आहे, मग तो पक्ष कोणताही असो.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये केज, आंबेजोगाई हे दोन तालुके आणि नेकनूर शहरासारखा एक मोठा भाग समाविष्ट झालेला आहे. परंतु या मतदारसंघांमध्ये अद्यापही कुठलेच असे शाश्वत काम झालेले नाही.
विधानसभा मतदारसंघांमध्ये अद्यापही एमआयडीसी कार्यान्वित झालेली नाही. केज शहरातील फलोत्पादन च्या जागेचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या गावकऱ्यांना आपला भाजीपाला विकायला बसण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून देता आलेली नाही.केज शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना साधे खेळाचे मैदान असो किंवा एखादा बगीचा सुद्धा उभारता आलेला नाही.
शेवटी निधी मंजूर झाला म्हणून उद्घाटने केली मात्र चालू कार्यकाळात हे प्रश्न का मार्गी लागले नाहीत हे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ग्रामीण भागातील काही तुरळक रस्ते वगळता आजही खड्ड्यांतून आणि गुडघाभर चिखलातून नागरिकांना चालावे लागत आहे. केज शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवून छोट्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्यामध्ये सत्ताधारी आमदार यांचे कार्य समाधानी नाही.
शहर म्हणून आणि आपण त्याचे काही देणे लागतो हा विचार करून अद्यापही न नळ योजना नवीन तर सोडाच परंतु आहे ती सुद्धा दुरुस्त करता आलेली नाही. केज शहरातील जो विस्तारित भाग आहे त्या भागात अद्यापही नळ योजना पोहोचलेली नाही. अंतर्गत रस्ते हे अपवाद वगळता जैसे थे आहेत. त्यामुळे एवढे सारे प्रश्न प्रलंबित असताना नेमका विकास कोणता केला ? हे मात्र समजायला मार्ग नाही. आणि आम्ही मतदारसंघाचा किती विकास केला याचा डांगोरा मात्र पिटल्या जात आहे.
दरम्यान एवढी वर्षे सत्ता आपल्या हाती असताना प्रश्न जर प्रलंबित असतील आणि आम्ही किती विकास केला हे सांगण्याची वेळ जर येत असेल तर खरोखरच विकास झालाय का ?
मग विकास आम्हीच केलाय हे सांगण्याची गरज सत्ताधारी आमदारांना का लागावी ? हे कोडेच आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही आणि इच्छुक काही करतील असा विश्वास नसल्याने कुणी कितीही वल्गना केल्या तरी केज मतदार संघातील नागरिकांच्या संघर्षामध्ये काही फरक पडणार का ? याचाही डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. एक कुणीतरी निवडून येणारच आहे आणि मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारच आहे. परंतु वर्षानुवर्ष असेच चालत राहिले तर मतदारांनी नेमकं कुणाकडे बघायचं हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
