*जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले;*
*शेतकर्यासह नागरीक आनंदी*
केज-
केज तालुक्यातील मांजरा धरण जवळपास शंभर टक्के भरले असून, आज बुधवारी दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज, धारुर, अंबाजोगाई शहरांसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, मांजरा धरण आज सकाळी ९६ टक्के भरला. मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने जवळपास दुपारी १२ पर्यंत मांजरा धरण भरलं आहे. यामुळे मांजरा धरण प्रशासनाने आज बुधवारी (दि.२५) दुपारी १२:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १७३० क्यूसेक्स (४९.०० क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. यापूर्वीही नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आजही बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक वाढली तर आणखीही इतर दरवाजे उघडले जाऊ शकतात.
उद्या जलपूजन
दोन वर्षांनंतर मांजरा धरण भरले असून, ही शेतकऱ्यांसह सामान्य माणसासाठी आनंदाचे क्षण आहे. उद्या गुरुवारी (दि.२६) रोजी शेतकर्यांच्या उपस्थित धरणाचे जलपूजन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी सोशलमिडीयावरून कळवले आहे.
