मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी पाठवले राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र
बीड/प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, अंतरवाली सराटीत (दि.17) पासून आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यामुळे राज्यातील कोटी मराठ्यांचा आवाज असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशा मागणीचे पत्र बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी (दि.21)दिले आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची खा.बजरंग सोनवणे यांनी अंतरवाली सराटीत जावून भेट घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून उपोषण सोडविण्याची मागणी केली.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील, जीवाची परवा न करता, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलेले आहेत. समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आता माघार नाही, भले जीव गेला तरी चालेल. अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. मराठा समाजाला त्यांचा शब्द अंतिम असून ते मराठा समाजाच्या काळजाचा विषय आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे कदापिही दुर्लक्ष करता कामा नये. संविधानिक मार्गाने रास्त मागणी घेऊन आंदोलन सुरू असेल तर सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे की, जातीने या आंदोलनाकडे लक्ष दिले पाहिजे. आमरण उपोषण सुरू होऊन एक आठवडा होत आला आहे. मात्र अद्यापही सरकारने पावले उचललेली नाहीत. ही बाब चिंतेची आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री यांनी जराही विलंब न करता, तातडीने उपोषण सोडविण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.
चौकट
पाटील आमच्या अस्मितेचा विषय
अंतरवाली सराटीत मराठ आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. बीड जिल्ह्याचे खा.बजरंग सोनवणे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी ते म्हणाले पाटील कोटी मराठी तुमच्या सोबत आहेत. समाजासाठी तुम्ही आज जीवाची परवा न करता उपोषण करत आहात. तुमचा हा लढा आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी एक नवी पहाट असणार आहे. त्यामुळे तातडीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी.कारण मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. अशा लोकभावना खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
