मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी;
केज :-
केज येथील नगरपंचायतीच्या घरकुल घोटाळ्यात संशयित आरोपी व निलंबित केलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव मस्के यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, या मागण्यासाठी नातेवाईकांनी गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन ही केले. पहाटे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ३३ तासाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
केज नगरपंचायतीच्या प्रधानमंत्री घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये संशयित आरोपी असलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव शामराव मस्के यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी मस्के यांना शासकीय सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर ते फरार असलेले भीमराव मस्के यांना २४ जून रोजी रात्री ११ वाजता ह्रदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह गुरुवारी रात्री तहसील कार्यालयात आणून त्यांच्या मृत्यूस मुख्याधिकारी अजित टोपे, लक्ष्मण जगताप, असद खतीब, तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत, तत्कालीन मुख्याधिकारी निता अंधारे हे कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रभारी तहसीलदार शुभम पवार यांनी चर्चा करून वरिष्ठांना माहिती कळविली. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यरात्री केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शुक्रवारी पहाटे चार वाजता अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी आंदोलनस्थळी येऊन चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. दि. २६ रोजी सकाळी नऊ वाजता भीमनगर भागातील स्मशानभूमीत भीमराव मस्के यांच्या मृतदेहावर ३३ तासाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मयत भीमराव मस्के यांचा मुलगा विक्रांत मस्के यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरकुल घोटाळ्यात वडील भीमराव मस्के यांचा काही गुन्हा नसताना मुख्याधिकारी अजित टोपे, लक्ष्मण जगताप, असद खतीब, तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत, निता अंधारे या लोकांनी त्यांच्या खात्यावर व्यवहार करून त्यांची फसवणूक केली. त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंद केल्यापासून ते भयभीत आणि घाबरलेले होते. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली, त्यातून त्यांचा बीपी वाढत व कमी होत होता. त्यामुळे मी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यास गेलो असता त्यांनी घरकुलाच्या फाईलची कुठे आहेत. अशी विचारणा केल्याने त्यांना फाईल ऑफिसमध्ये आहेत. वडील हे ताणतणावात असल्याचे सांगितले. मात्र ते तुझ्या वडिलांची जामीन होऊ देत नाही, त्यांना अडचणीत आणतो, म्हणाले होते. ताणतणावातून वडील भीमराव मस्के यांना २४ जून रोजी रात्री ११ वाजता ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. म्हणून मुख्याधिकारी अजित ढोपे, लक्ष्मण जगताप, असद खतीब, तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत, निता अंधारे यांनी अपहार करून वडिलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांचा ताणतणावातून मृत्यू झाला. याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. अशी त्यांची नोंदवून घेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार बाळासाहेब रोडे हे करीत आहेत.
भिमराव मस्के यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
