केज तालुक्यातील सर्वात सुंदर सरकारी शाळेचा बहुमान पटकावला जि.प.मा.शा. भाटुंबा शाळेने
केज-
पंचायत समिती केज येथील सभागृहात पार पडलेल्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात केजच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने मॅडम यांच्या हस्ते जि.प. माध्यमिक शाळा, भाटुंबा शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना तीन लाख रुपयांचा प्रतिकात्मक धनादेश, विजयी चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये सन २०२४-२५ चे शासकीय व्यवस्थापनाच्या शाळा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन शाळांची निवड केली जाते. या निवडलेल्या शाळा पुढे जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात. भरपूर किचकट निकष असणारी ही स्पर्धा प्रत्येक शाळेचा कस पाहते. शाळेचे बाह्य रूप, परिसर, मैदान, वृक्षारोपण, शाळेत किती उपक्रम राबवले जातात? उपक्रमांचा दर्जा कसा असतो? विद्यार्थ्यांचा सहभाग किती असतो? सर्व उपक्रमांचे रेकॉर्ड केव्हापासून मेंटेन केलेले आहे? असे अनेक निकष पार करत केज तालुक्यातून
प्रथम क्रमांक जि प माध्यमिक शाळा भाटुंबा (तीन लाख रुपये),
द्वितीय क्रमांक जि प उच्च प्राथमिक शाळा, तांबवा (दोन लाख रुपये),
तृतीय क्रमांक जि प प्राथमीक शाळा शिंदी (एक लाख रुपये) या शाळांनी बहुमान पटकावलेला आहे.
बक्षीस वितरण करत असताना माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी भाटुंबा या गावाचे आणि शाळेचे विशेष नामोल्लेख करत कौतुक केले हे विशेष.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केजचे गटशिक्षणाधिकारी श्री लक्ष्मणरावजी बेडस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी श्री सुनील केंद्रे सर आणि श्री दत्ता चाटे आबा
उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना जि प माध्यमिक शाळा भाटुंबा शाळेचे मुख्याध्यापक श्री. डॉ. कंचनवार सर यांनी सर्वांनाच मागील काही वर्षातील एका पत्र्याच्या खोलीपासून ते वर्तमान शाळा यातील बदल अनुभवण्यासाठी सर्वांना भाटुंब्यास येण्याचे आमंत्रण दिले. होळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संजय चवरे (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली भाटुंब्याची शाळा उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख आणि विजेत्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा सिरसट आणि कार्यक्रमाचा समारोप श्री.आश्रुबा सोनवणे सर यांनी छान प्रकारे केला.
