विकसित भारत घडवायचा असेल तर सांस्कृतिक मूल्ये जपण्यावर भर दिला पाहिजे-
डॉ. उदय निरगुडकर
केज –
आपल्या मुलांचे चांगले भविष्य घडवायचे असेल तर आपण त्यांना शाळेमध्ये पाठवतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतो तसेच आपली तब्येत चांगली हवी असेल तर आपण जिम लावतो. या प्रक्रियेमध्ये आपल्याला काहीही करावे लागत नाही. कारण बदल घडवून आणण्याची जबाबदारी ही डॉक्टर, शाळा तसेच जिम मालकांची असते. तसेच राज्य चालवण्याची जबाबदारी ही आपण निवडून दिलेल्या सरकारची असते. जर त्यांनी योग्य पद्धतीने समाजाचे प्रश्न सोडवले नाही तर आपण दुसरे सरकार निवडून आणतो. ही एक प्रक्रिया आहे. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. पुढील काळात १९६२ मध्ये चीनचे आक्रमण, १९७१ मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणाने भारताच्या विकासाला ग्रहण लागले. हीच पार्श्वभूमी १९७७ च्या निवडणुकीला होती. त्यातच राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा, जनता पक्षाचे अपयश या घडामोडीमुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता. अशी परिस्थिती हेतू आणि कृती यांच्यामध्ये अंतर असलं की असे घडतच असते. सन १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आली. पूर्वी राजेशाही होती तेंव्हा यथा राजा तथा प्रजा असे म्हटले जायचे, लोकशाही आल्यानंतर यथा प्रजा तथा राजा असे म्हटले जाते. जवळपास ८६ देशांचा मी प्रवास केला. परंतु एका देशाचा प्रवास करताना मला जाणवले, की असं कधीच होत नाही. सामान्य माणूस मोठा आणि देश छोटा, किंवा सामान्य माणूस छोटा आणि देश मोठा. देश छोटा म्हणजे, सामान्य माणूस हतबल व गुलामगिरी मानसिकतेचा असतो. सन १७५७ मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज शिपायाच्या अवघ्या ३ हजार सैन्याने नवाब सिराज उद्द्योलाच्या ५० हजार सैन्याचा पराभव केला. विजयाचा जल्लोष साजरा करताना १ लाख लोक पाहत होती. जर त्यांनी ठरवलं असतं तर त्या मूठभर सैनिकांचा नायनाट होऊ शकला असता परंतु सामान्य माणूस एकवटला नव्हता कारण तो हतबल व गुलाम झाला होता. दुसरी बाजू सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांचे निधन झाले. १६८९ मध्ये संभाजी महाराजांनी बलिदान दिले. पुढे राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. परंतु पुढील २७ वर्ष अफगाणिस्तानापासून तुंगभद्रापर्यंत विस्तार केलेल्या क्रूर, पाशवी शासकाला मराठ्यांनी झुंजवत ठेवत इथेच गाढलं. म्हणूनच यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आजही छत्रपती शिवरायांची जयंती अत्यंत हर्षोत्साहात साजरी केली जाते. अर्थात देशाला विकसित बनवायचे असेल तर माणसे मोठी झाली पाहिजेत तर देश मोठा होईल. जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवायचा असेल तर आपली सांस्कृतिक मूल्ये जपण्यावर भर दिला पाहिजे. तसेच नवकल्पना आणि पायाभूत सुविधांना चालना दिली पाहिजे. असे प्रतिपादन मुंबई येथील जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २६ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर ही उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून श्री. प्रकाश महाजन ज्येष्ठ नेते मनसे, यांनी उपस्थिती दर्शवली. इतर उपस्थित मान्यवरांमध्ये रमेशरावजी आडसकर अजित पवार राष्ट्रवादी गट माजलगाव मतदार संघ, प्रकाश भन्साळी तसेच जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी. बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी, नारायण अण्णा अंधारे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट, प्रा. वि. चे मु. अ. वसंतराव शितोळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय बालकृष्णा चोले यांनी दिला. सातवे पुष्प गुंफताना ” विकसित भारत ” या विषयावर बोलताना डॉ. उदय निरगुडकर पुढे म्हणाले, इतिहासातील योग्य माणसाचा सन्मान करायला शिका तरच तुम्हाला योग्य दृष्टी मिळेल. याप्रसंगी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी आयटी क्षेत्र हा भारताचा भविष्यकाळ आहे हे स्पष्ट करताना आयटी शिक्षण व प्रशिक्षण, सक्षम सेवा, पायाभूत सुविधा, वित्त आणि माध्यम अशा विविध उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तेंव्हा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांच्या त्यांच्या मुलाखतींचा प्रेक्षकांवर खोलवर परिणाम झाला आहे. मुख्य संपादक म्हणून त्यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या गटासह पत्रकारितेत अनेक ट्रेंड सेटिंग संकल्पना सादर केलेल्या आहेत.
अध्यक्षीय समारोपात प्रकाश महाजन म्हणाले, उदय निरगुडकर यांची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत वैभवशाली आहे. तसेच इतिहासाचा फार मोठा वारसा उदयजींना लाभलेला आहे. राष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या पूर्वजांनी देखील बलिदान दिलेले आहे.
कार्यक्रमाचे सुञसंचलन निशिगंधा क्षीरसागर यांनी केले तर आभार व्यक्त करताना रघुनाथ चौरे यांनी यावर्षी २५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेसाठी निमंत्रित सन्माननीय व्याख्याते व अध्यक्षांचेही मनःपूर्वक आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला आपल्या दैनिकातून प्रसिद्धी देऊन सहकार्य केलेल्या सर्व पत्रकार बंधूंचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
