आज केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन;
बंद पुकारला नसल्याने केज शहर सुरळीत चालू राहील
केज/प्रतिनिधी
आज बुधवारी केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दलित समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.
मात्र बंदची हाक दिली नसल्याने सर्व व्यवहार,दुकाने, शाळा सुरू राहील असे कार्यकर्ते यांनी कळवले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक केज, येथून शहरातील मुख्य रस्त्याने दलित आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा काढून तहसीलदार केज यांना तालुक्यातील दलित समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
केज शहरात निघणाऱ्या दलित समाज बांधवांच्या मोर्चाचे कारण असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरिल संविधान शिल्पलेखाची मोडतोड करून विटंबना करून दलित समाजाच्या भावना दुखावल्या त्या आरोपीस कडक शिक्षा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी अवदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मस्साजोग येथील दलित कर्मचारी भगवान सोनवणे यास मारहाण केली त्या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करून शासन करावे, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून त्यांचे अमानुषपणे क्रूरतेने मारहाण करून त्यांचा निघृणपणे खूण करणाऱ्या सर्व आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी,
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी तसेच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवारास शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी,
मा. दंडाधिकारी केज यांनी केज तालुक्यातील दलित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये दिवसांनी दिवस वाढ होत आहे. त्यामुळे अनुसूचित घटक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे न्यायदांडाधिकारी साहेबांनी सदर घटनेवर कायद्याचा धाक व प्रशासनाची कडक नजर राहावी याकरिता आपल्या अध्यक्षतेखाली शासन समितीची स्थापना करून त्यामध्ये सामाजिक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा असे तहसीलदार केज यांना लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या लेखी निवेदनावर अशोक गायकवाड, योगेश भाई गायकवाड, लखन हजारे, रोहित कसबे, सुंदर खाडे, सुनील हिरवे,संतोष ठोके, निलेश साखरे,धीरज मस्के, बापू गायकवाड,अनिल उजगरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.