*खासदार बजरंग सोनवणे यांचा केज येथे भव्य सत्कार संपन्न*
*माझ्या विजयाचे श्रेय आदरणीय शरदचंद्र पवार मनोजदादा जरांगे पाटील आणि मायबाप जनतेला*
—- खा. बजरंग सोनवणे
*ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी प्रमाणिक राहा आणि चेहरा नसण्याऱ्याना चेहरा देण्याचा काम ज्यांनी केलं त्यांना विसरता येत नाही*
—- माजी मंत्री अशोकराव पाटील
*गद्दार मित्र म्हणून त्यांनी त्रास दिला नसता तर बजरंग सोनवणे खा. झाले नसते !*
—- महेबुब शेख
गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे हे खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात पदार्पण केले त्या निमित्त त्यांचा केज नगरीत भव्य दिव्य सत्कार संपन्न झाला.
सोमवार दि. ८ जुलै रोजी बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांचे जिल्ह्यात आगमन होताच मांगवडगाव फाटा येथून बीड जिल्ह्यामध्ये आगमन होताच तेथे लाखा मांगवडगाव, सातेफळ, बोरगाव आणि भोपला येथील नागरिकांनी त्यांचा भव्य असा स्वागत केले. त्या नंतर सुर्डी फाटा, माळेगाव आणि साळेगाव येथे ही कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. तसेच पुढे चिंचोली फाटा, गांजी फाटा आणि चिंचोली फाटा येथे रस्त्यामध्ये जागोजागी गावकऱ्यांनी अडवून त्यांचे वाटेत स्वागत केले. तर केजमध्ये आगमन होताच शिवाजी चौकात पुष्पहार केल्या नंतर खा. बजरंग सोनवणे यांचा जेसिबिने भला मोठा पुष्पहार घालून आणि जेसिबितून फुलांचा वर्षाव करून उघड्या जीप मधून ढोल, ताशा, सनई चौघडा यां पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक सुरू आहे. त्यांच्या सोबत युवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, हाजी नवाब मामु हे उपस्थित होते. या भव्य मिरवणुकीत केज मध्ये जागोजागी पुष्पहार घालून खा बजरंग सोनवणे यांचे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
त्या नंतर विठाई मंगल कार्यालयात माजी मंत्री अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शेकापचे भाई मोहन गुंड होते तर या सोहळ्यास राकॉ चे युवा प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, सहाय्य्क संचालक डॉ. अशोक थोरात, माजी आ पृथ्वीराज साठे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, माजी सभापती राजेसाहेब ( पापा ) देशमुख, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, राकॉ शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष संजीवनी देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, जेष्ठ नेते सय्यद साजेद अली, राकॉ शरदचंद्र पवार पक्षाचे केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, राकॉ प श प चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, आष्टी विधासभा प्रमुख राम खाडे, के ज विधानसभा प्रमुख सुरेश तात्या पाटील शिवसंग्रामचे केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड या प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर खा. बजरंग सोनवणे यांच्यासह त्यांचे आई वडील, पत्नी सौ सारिका सोनवणे, मुलगी डॉ, हर्षदा आणि सौरव व गौरव ही दोन्ही मुले देखील उपस्थित होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना बजरंग सोनवणे म्हणाले की, माझ्या यशाचे श्रेय हे शरदचंद्र पवार, मनोजदादा जरांगे आणि मायबाप जनतेला आहे. तसेच पालक मंत्री आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार यांचे नाव न घेता खा बजरंग सोनवणे म्हणाले की, पराभव पचवता यायला हवा. आदळा आपट करून काही होत नसते. तसेच ज्यांनी माझी लायकी आणि प्रारब्ध काढले त्यांची लायकी काय आहे हे त्यांना जनतेने दाखवून दिले असा टोलाही त्यांनी लगावला तर त्यांनी जे पेरलं तेच उगवलं असेही म्हणाले. तसेच आता जबाबदारी वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधासभेच्या जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एक जुटिने लढणार असून ही वज्रमूठ पक्की असल्याचे सांगत केजाचा आमदार हा महविकस आघाडीचाच असेल यावर त्यांनी जोर देत मुंदडा यांना शह देण्याचे सूतोवाच केले. जिल्ह्यातील मतदारांनी भल्या भल्यांची घमेंड आणि मस्ती उतरविली असेही ते म्हणाले. तसेच ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून किती दिवस मते मागणार असा टोला त्यांनी भाजप नेतृत्वाला लगावीत आता हा जिल्हा प्रगतशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. तर आम्हाला सत्कार पेक्षा कामाची सवय आहे असे म्हणीत त्यांनी सांगितले की, ते निवडून आल्या नंतर त्यांनी पहिली जिल्ह्यातील रस्ते व रेल्वे संदर्भात आणि विकास कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व जातीधर्माच्या मतदारांनी मतदान असल्याने त्यांच्या अपेक्षाला तडा जावू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांनी भारत यात्रा काढून सामान्य मतदारांशी संपर्क ठेवला. तसेच काम करताना हार जित याच्या पलीकडे जावून ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी प्रमाणिक राहा आणि चेहरा नसण्याऱ्याना चेहरा देण्याचा काम ज्यांनी केलं त्यांना विसरता येत नाही असे म्हणत दलीत-मुस्लिम मतदार यांनी केल्या मदतीची जाणीव ठेवण्याचे सूचित केले तर विरोधकांवर अत्यंत खुमासदार शैलीत टीका करताना साधू आणि उंदीर यांचे उदाहरण सांगितले. तसेच भावी आमदार म्हणून त्यांनी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा उल्लेख भाषणात केला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बालासाहेब बोराडे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे, महेश गायके, महादेव लाड, युवराज दादा काळे, कबीर इनामदार, शमशोद्दीन इनामदार , प्रकाश कामाजी, युवराज दादा गोरे, उत्तम अप्पा मस्के, दिलीप गुळभिले, गोविंद कणसे, तस्लीम इनामदार , हाजी अमजद खतीब , लालासाहेब वायबसे, शीतलताई लांडगे, नसरीन बागवान, कुलदीप करपे, विकास मिरगणे, पत्रकार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कार सोहळ्यासाठी मुकुंद कणसे, कपिल मस्के, भाऊसाहेब गुंड, सय्यद शरीफ, सागर डिकुळे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
—————————————————–
*मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पोस्टरचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सत्कार समारंभात करण्यात आले.*
—————————————————–
*कोण काय म्हणाले :-*
*महेबुब शेख, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) :-* गद्दार मित्र म्हणून त्यांनी त्रास दिला नसता तर कदाचित बजरंग सोनवणे हे खासदार झाले नसते. आता खा. बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील बारीक नेत्यावर टीका करू नये. असे म्हणून पालक मंत्री ना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्या ऐवजी लायकी काढणाऱ्या ना. अजित पवार यांना सुनेत्रा वहिनींच्या पराभवाची कारणमीमांसा विचारायला हवी. राज्यातील विविध प्रकल्प आणि उद्योग धंदे गुजरातला घेवून जात असताना इथल्या भाजपच्या नेत्यांना पण गुजरातला न्या असे म्हणत टीका केली.
————————————————
*माजी आ. साहेबराव नाना दरेकर :-* जिल्ह्यात एम आय डी सी, लघु उद्योग, सुरू करण्यासाठी प्रयत्न करा तसेच जिल्ह्यातील नळ योजनेतील भ्रष्टाचार उघड करून त्याची चौकशी व्हायला हवी आणि आष्टीच्या साखर कारखान्याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली.
————————————————
*माजी आ. पृथ्वीराज साठे :-* खा बजरंग सोनवणे यांच्या विजयात मराठा योद्धे मनोज जरांगे पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच निवडणुकीत पुढारी जरी एका बाजूला असले तरी सामान्य मतदार मात्र बजरंग सोनवणे यांच्या सोबत होता.
————————————————
*माजी सभापती राजेसाहेब देशमुख :-* २०१९ ला बजरंग सोनवणे यांनी लोकसभेचा पराभव हसतखेळत पचवला म्हणूनच ते आज ते विजयी झाले.
————————————————
*डॉ. अशोक थोरात :-* खा बजरंग सोनवणे यांची राजकारणाची सुरुवात ही गावच्या ग्रामपंचायती पासून ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात झाली. एका सामान्य कुटुंबातील तरुणाची ही झेप थक्क करून जाणारी आहे.
————————————————
*रत्नाकर शिंदे (जिल्हा प्रमुख, उबाठा) :*- लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकीची वज्रमूठ आवळून काम केले. म्हणूनच त्यांनी असा हाबाडा दिला आहे की, आता त्याचा नाद कुणी करणार नाही.
————————————————
*वीज वितरण आणि अधिकाऱ्यांना खा. बजरंग सोनवणे यांनी दम भरला !:-* वीज वितरण कंपनी जर शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल आणि स्थानिक आमदार यांचे ऐकत असतील तर नियमानुसार वागा आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करावे अन्यथा गय करणार नाही असा दम भरला.
————————————————
