उचली पोटी ऊसतोड मुकादमाचे अपहरण
गौतम बचुटे/केज :- ऊस तोडणी साठी मजूर पुरविण्याचा करार करूनही मजूर पुरवठा केला नाही म्हणून केज तालुक्यातील एका ऊस तोड मजुराच्या अपहरण करण्यात आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथील रवी माणिक लांब नागरगोजे याने कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा ता. करवीर यांच्या कडून ऊस तोडणी मजुर पुरवण्याचा करार करून १७ लाख ५० रु उचल घेतली होती. परंतु सन २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या महामारी मुळे व लॉक डाऊनमूळे त्याने मजूर पुरवठा केला नव्हता. त्यामुळे सदर कारखान्याचे अधिकारी हे त्याला ऊसतोड मजूर तरी पुरवा किंवा घेतलेले पैसे परत द्या असा तगादा लावीत होते.
दरम्यान दि. २ जून रोजी बनकरंजा येथे काही अज्ञात लोकांनी रवि याच्या बाबत गावात चौकशी केली होती. त्या नंतर तो अंबाजोगाईकडे जात असताना त्याला बनकरंजा पाटी जवळ अनोळखी व्यक्तींनी अडवून त्याचे अपहरण केले आहे; असे रवि याने त्याच्या वडिलांना फोन वरून कळविले. त्या नंतरही पुन्हा रवीच्या वडीलांना फोनवरून पैसे जमा करा असे सांगितले. त्यावर रविचे वडील त्यांना म्हणाले की पैसे जमा झाल्यास ते पैसे परत देणार आहेत.
दरम्यान अद्याप तो परत आला नसल्याने त्याचे वडील माणिक रघुनाथ लांब नागरगोजे यांच्या फिर्यादी वरून छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी अजित गाडे व कर्मचारी विकास जरग, तानाजी चौघुले व अज्ञात इसमा विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२६/२०२३ भा. दं. वि. ३६५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास काळे हे करीत आहेत.