भविष्यकालीन दृष्टिकोनातून पाणी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज – डॉ. शंकरराव नागरे
गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरा आधार मिळतो – डॉ. भगवानराव कापसे
केज –
भारत हे एक कृषिप्रधान राष्ट्र आहे, तेंव्हा भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. वर्षभराच्या तुलनेमध्ये मान्सून महिन्यात ८०% पाऊस पडतो. तर उर्वरित काळात केवळ २० टक्के पाऊस पडतो. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण भागाची परिस्थिती पाहता मराठवाड्यात पाणी कमी आहे. मराठवाड्याला ६०० टीएमसी पाण्याची गरज असते, परंतु २५० टीएमसीच उपलब्ध होते. आज विदर्भात ९६२ धरणामध्ये २४ टक्के पाणी आहे, पुणे, नाशिक भागातील १७१९ धरणामध्ये ३० टक्के पाणी आहे, कोकणमध्ये ४२ टक्के पाणी आहे तर मराठवाड्यात १०९७ धरणामध्ये केवळ २१ टक्के पाणी आहे. म्हणजे सिंचनातही मराठवाडा मागे आहे. भविष्यात मराठवाड्याला बाहेरून पाणी आणावे लागेल, यासाठी २००५ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायदा देखील अस्तित्वात आलेला आहे. परंतु भविष्यकालीन दृष्टीकोनातून पाणी व्यवस्थापन आणि गटशेती यावर शेतीचे भविष्य अवलंबून आहे. असे प्रतिपादन डॉ. शंकरराव नागरे यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २५ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शंकरराव नागरे, मा. कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ तथा तज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून डॉ. भगवानराव कापसे उपाध्यक्ष, महाकेसर आंबा बागायतदार संघ तथा गटशेती प्रणेते हे उपस्थित होते. इतर मान्यवरांमध्ये प्रा. मुजफ्फर सय्यद सेवानिवृत्त प्राध्यापक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, राजेसाहेब देशमुख माजी अध्यक्ष, स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज, इंजी. हनुमंतराव देशमुख, तसेच जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष, अंकुशरावजी इंगळे उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, संस्थेचे सचिव जी. बी. गदळे, नारायण अण्णा अंधारे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, प्राचार्य उपेंद्र कोकिळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय इंजी. हनुमंतराव देशमुख यांनी दिला. सहावे पुष्प गुंफताना ” मराठवाड्यातील पाणी व गट शेती” या विषयावर बोलताना डॉ. शंकराव नागरे पुढे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पाणी हे रेशनिंग स्वरूपात मिळते. भारतामध्ये बेंगलोर मध्येही पाण्याचा अपव्यय केल्यास दंड भरावा लागतो. तेव्हा पाण्याचा उपयोग मानवी जीवनासाठीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्र तसेच शेतीसाठीही होतो. तेंव्हा भविष्यकालीन दृष्टीकोनातून पाणी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.
अध्यक्षीय समारोपात डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, भारत हा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला पण शेतकरी नाही. आजचा तरुण हा शेती करण्यासाठी उत्साही नाही, कारण शेती आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं सरासरी क्षेत्र दोन एकर आहे, तेच अमेरिकेमध्ये सहा हजार एकर आहे. अशा क्षेत्रांमध्ये महागडी यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून, उत्पन्नही भरघोस मिळवता येते. ब्राझीलमध्ये तर शेतकऱ्याचा ३० ते ४० हजार एकर कापूस असतो. पुढे गटशेती विषयी बोलताना ते म्हणाले, गट शेती म्हणजे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करणे, जेणेकरून शेतकऱ्याचे एकरी उत्पादन वाढले पाहिजे. पुढे केसर आंब्याच्या उत्पादन प्रक्रियेशी निगडित सखोल असे मार्गदर्शन केले. त्यांचे या विषयावर “आंबा” या शीर्षकाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. शेवटच्या सत्रामध्ये उपस्थितांनी विचारलेल्या केसर आंब्याच्या लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतच्या विविध प्रश्नांचे योग्य व समर्पक पद्धतीने समाधानही केले.
कार्यक्रमाचे सुञसंचलन विक्रम डोईफोडे यांनी केले तर आभार प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.
