२७ दिवसा पासून पाऊस नाही तर पीक येईलच कसं ?
हेक्टरी ६० हजार रु नुकसान भरपाई देण्याची स्वाभिमानीची मागणी
गौतम बचुटे/केज :- तब्बल २७ दिवसा पासून पाऊस पडला नसल्याने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६० हजार रु. नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
खरिपाची पिके कोवळी असताना व त्याला पाण्याची गरज असताना २७ दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी मात्र पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता ही पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी कृषि मंत्री व सरकारने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ६० हजार रू. नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दि. २३ ऑगस्ट रोजी केजचे तहसीलदार अभिजित जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर आणि मराठवाड्याचे नेते अशोक अण्णा गित्ते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी फेरोज पठाण, अमोल थोरात, खालेक फारुकी, मेहराज पठाण, मगर सर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
