बीड पोलीसांनी जादूटोणा विरोधी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी–हनुमंत भोसले
केज- पोलीस हे समाजाचाच घटक आहेत. जादूटोणा, भूत व भानामती यासारख्या बाबींचा खुलेआम वापर करणाऱ्या भोंदूगिरीविरोधात आज कठोर पावले न उचलल्यास समाजबरोबरच पोलिसांचे कुटुंबीय देखील याचे बळी ठरू शकतात. यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने जादूटोणा, भूत-भानामतीची भीती दाखवून समाजाचे शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कठोर पावले उचलावीत अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले आहे.
समाजाची ईश्वर विषयक श्रद्धा ही वेगळी बाब आहे. मात्र देव, धर्म व अध्यत्माच्या आडून गावपातळीवर व वेगवेगळ्या शहरातून सामान्य नागरिकांना जादूटोणा, भूत-भानामती व करणी सारख्या बाबींची भीती दाखवून प्रचंड शोषण व लूट करत आहेत. अनेक वेळा सामान्य लोक विविध समस्येने ग्रस्त होऊन दबलेले असतात. छोट्या मोठया आजारासाठी बरेच लोक वैद्यकीय इलाज घेतात. कांही वेळा वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा अचूक निदान न करू शकल्याने अशा लोकांचे आजार वेळेत बरे होऊ शकत नाहीत व परिणामतः वैद्यकीय क्षेत्रातही खूप प्रयत्न केले असे सांगत समाजातील असे अनेक लोक शेवटी भोंदूगिरीला शरण जातात जेथे इलाज तर दूरच पण त्यांचे मानसिक, शारीरिक, लैंगिक व आर्थिक शोषण केले जाते. जीवनातील इतर अनेक समस्येबाबतही असेच घडत आहे. सध्या लोकांना कांहीही न करता मोठे यश हवे आहे.अशा लोकांची भोंदूगिरी क्षेत्र शिकार करण्यासाठी वाट पाहतच बसलेले असतात. अशा लोकांना समाजाने अजिबात संरक्षण देऊ नये. या लोकांवर समाज व पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामान्य लोकांना छोटी मंदिरे बांधून किंवा इतर ठिकाणी बसून “बघण्यासाठी” म्हणून बोलावून लिंबू-सुया-नारळ अशा बाबींचा वापर करून जादूटोणा, भूतभानामती व करणी सारख्या गोष्टीचा प्रसार करतात त्यांच्यावर शहानिशा करून पोलीस कार्यवाही करणार आहे. अशा लोकांची पाठराखण करणाऱ्या लोकांबद्दलही समाजात जनजागृती केली जाईल. जिल्ह्यात ज्या गावात किंवा भागात असे भोंदूलोक पैसे किंवा इतर वस्तू रूपाने असे कृत्य करणारे लोक असतील तर अशा लोकांची माहिती महाराष्ट्र अंनिस चे जिल्हाध्यक्ष हनुमंत भोसले यांच्याकडे 9423733888 या मोबाईल क्रमांकावर दयावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या चळवळीत कार्य करू इच्छिणाऱ्या युवक-युवती व नागरिकांनीही वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यांत आले आहे.
