दारी अंगणी लाविलं रोप वाढलं का बाई ,
त्याच्या बुडाचं कैचन कुणी काढलं का बाई…..
केज दि २१(प्रतिनिधी)
—————————-
उंदरीच्या ‘कर्मयोगी बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या’ मागील आठ वर्षाच्या परंपरे नुसार वर्षीही दि.१८ मे २०२३ रोजी सायंकाळी स्मृती समारोहाची सुरुवात कविसंमेलनानेच झाली. कविसंमेलनाचे समन्वयक होते कविवर्य जनार्धन सोनवणे आणि निमंत्रक होत्या कवयित्री अनुराधा सूर्यवंशी (ठोंबरे), या कविसंमेलनाचं बहारदार समयोचित सूत्रसंवाद कवी राजेश रेवले आणि कवी गोरख शेंद्रे यांनी केले.या कविसंमेलनात मुकुंद राजपंखे, रंगनाथ काकडे, राजेंद्र रापतवार, राहूल गदळे, पांडुरंग वागतकर आणि उपस्थितांमधून उत्सफुर्तपणे कु. क्रांती गायकवाड, कु. अंकिता ठोंबरे यांनीही आपल्या कविता उपस्थितांना ऐकवून वातावरण आनंदीत केले.
कविवर्य राजेश रेवले :
कवी राजेश रेवले यांनी आपल्या सुंदर काव्यवाचनातुन आई-वडीलांबद्दल अपार श्रद्धा व्यक्त केली.आईचं वात होवून गृहगाभा-याला उजळून टाकणं आणि बापाच्या गृहमंदिराचा कळस होणं अशा सुंदर प्रतिमांनी आईचं मोठेपण अधोरेखीत केलं.
“माय बोंडं फुलं पातं, माय कापसाची वात
नवी आशा फुलवती, माय बापाच्या मनात !
माय घराचा उंबरा, माय अंगणी तुळस
बापाच्या मंदिराची, माय असते कळस !”
कविवर्य गोरख शेंद्रे :
कवी गोरख शेंद्रे यांनी भरकटलेल्या तरुणाईला दिशा देताना सुंदर कविता ऐकवली.शाळा महाविद्यालयात शिकताना जर आयुष्याला सुसंसिकारी वळण लागलं नाही तर मुलं हातून सुटतात आणि कुटुंबाच्या जिवाला घोर लागून रहातो.अशा लेकरांसाठी ही कविता…
“वाचत जा पुस्तक
वाचत जा समाज
निळ्या भगव्या बरोबर
पाडीत जा नमाज
रंगांच्या भेदामध्येच
बरबाद झाल्या पिढ्या
उगाच कोणाच्या भानगडीत
पडू नकोस वेड्या !”
कविवर्य राजेंद्र रापतवार :
अंबाजोगाईचे कवी राजेंद्र रापतवार यांनी ‘सुंदर नाते निसर्गाचे जपू कृषी धन’ ही कविता ऐकवली.शेतक-यांनी आपली शेती बाजाराचा आंदाज घेऊन नियोजनपुर्वक केली तर पिढ्यान् पिढ्याच्या दु:खापासून सुटका होवू शकेल. निसर्गाचा लहरीपणा, नशा आणि कर्जबाजारीपण सोडून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करुन शेतीत आनंद निर्मिती करता येवू शकेल ही आशा वाटते.
“झुगारून देऊ निसर्गाची मनमानी
वृक्षारोपण संवर्धनाची घेऊन हमी.
ते आता नशा दारूचे नकोच प्राशन
नकोच ऋण-कर्ज योजनेचे प्रलोभन !”
▪कविवर्य रंगनाथ काकडे :
बनसारोळ्याचे कवी रंगनाथ काकडे यांनी शेतक-याच्या दु:खाला वामन कारणीभूत असल्याचा इतिहास पुनरुज्जीवित केला खचलेल्या शेतक-यांचं बळ बांधणारी सुंदर रचना होय.
“शब्द विकणाऱ्यांची जातकुळी
नाही आमुची
कष्टकऱ्यांची ही अवलाद आहे
मतलबी लवचिकता अंगी नाही आमुच्या
स्वाभिमानाचा ताठ कणा पोलादी आहे
जरी रूप बदलून आजही
आलास वामना
डोक्यावर पाय ठेवण्याआधी
होऊ दे आणखी एक सामना !”
▪कविवर्य राहुल गदळे :
केजचे कवी राहूल गदळे यांनी शालेय शिक्षणानंतर लग्न करुन लेकीबाळी सासरी निघून जातात आणि घरातलं, गावातलं चैतन्य हरवून जातं ही घालमेल गावच्या शाळेला, वडाच्या पारंब्यांना, नद्यांना जाणवल्या शिवाय रहात नाही.
” नटून थटून
लाजत मुरडत
गावात फिरल्या पोरी
कुठं हरवल्या पोरी
भर दुपारी वडाखाली
सुरपाट्या खेळतानी
परंब्यासोबत झुलल्या पोरी
कुठं हरवल्या पोरी ”
▪बालकवयित्री कु. अंकिता ठोंबरे :
उंदरीची बालकवयित्री कु.अंकिता ठोंबरे ही दहाव्या इयत्तेत शिकणारी मुलगी.आपल्या दैनिक आयुष्यातील जगणं आवेशपुर्ण शैलीत सादर केलं. तिने शेतक-यांच्या दु:खाची रचना ऐकवली. या कवितेतून शेतीची दयनीय परीस्थिती असली तरी त्याच्या कष्टामुळं नक्की चांगले दिवस येतील हा सुंदर आशावादही व्यक्त केला.
“नियती खेळत आहे
शेतकऱ्यांबरोबर खेळ
थोडा संयम धरा,
एक दिवस नक्कीच येईल
शेतकऱ्यांची वेळ !”
▪कवयित्री कु. क्रांती गायकवाड :
कवयित्री क्रांती गायकवाड यांच्या कवितेतून मुली पहायला येण्याचा प्रसंग मांडत असताना मुलींची होणारी घुसमट मोठ्या बारकाव्यासह टिपली आहे.
” लग्नासाठी पाहुणे तिलाच पहायला येतात
गो-या कातड्याची प्रसंशा करत तिला पसंत करुन जातात
रंग काळा असेल तर परत चक्र फिरंतच रहातं
कांद्या पोह्याच्या तमाशात तिचं मन मात्र करपत जातं.”
▪कवयित्री अनुराधा सुर्यवंशी (ठोंबरे) :
कवयित्री अनूराधा सुर्यवंशी (ठोंबरे) यांनी कर्मयोगी प्राचार्य बालासाहेब ठोंबरे या आपल्या स्वर्गवासी वडिलांना आपल्या कवितेतून विनम्र अभिवादन केलं.वडीलांच्या स्मृती जाग्या करताना जड अंत:करणानं त्यां म्हणाल्या…
“आज तुम्ही असता तर
जगणं असतं वेगळं
आयुष्याची कोडी सोडविणं
सोपं असतं सगळं !
आज तुम्ही असता तर
कशाचीच नसती उणिव
आपल्या माणसांच्या गर्दीत
दुःखाची झालीच नसती जाणीव !”
▪कविवर्य पांडुरंग वागतकर :
परभणीचे कवी पांडुरंग वागतकर यांनी आपल्या कृषीजीवनविषयक कविता ऐकवल्या. आषयसंपन्न कवितांचं सुस्पष्ट काव्यवानचन करताना ते म्हणाले…
“गोठ्यावरच्या पाचटाला चघळुन,
पोटाची आग विझवते गाय,
कणगीच्या तळाला घरासाठी
भाकर शोधते माय.
आठलेल्या विहिरीवर चिखलालाच हूंगते गाय,
हांडाभर पाण्यासाठी रान धुंडाळते माय.”
▪कविवर्य जनार्धन सोनवणे :
केजचे जेष्ठ कवी जनार्धन सोनवणे यांनी ‘हिशोब’ ही कविता ऐकवून शेती आणि शेतक-यांच्या पिढ्यान् पिढ्यांच्या दु:खाला वाचा फोडली.
“दुष्काळ पडो अथवा सुकाळ होवो,
ज्याचा त्याचा हिशोब पटलेला असतो.
पाऊस पडो अथवा न पडो
शेतकरी राजा मात्र लुटलेला असतो.”
▪कविवर्य मुकुंद राजपंखे :
कुठलाही उपक्रम असो नाही तर यौजना सुरु करताना असलेला आनंद, उत्साह शेवटपर्यंत टिकायला हवा आणि त्याची फलनिष्पत्ती व्हायला हवी ही रास्त भूमीका मांडली.वृक्षारोपण केल्या नंतर त्या झाडांची सर्वतोपरी निगरानी करण्याची जबाबदारीही आपलीच समजून पार पाडायला हवी.झाडांसारखा तुकोबा म्हणतात तसा आनंददायी ‘सोयरा’ नाही याची जाणीव करुन दिली.
“दारी अंगणी लाविलं रोप वाढलं का बाई ?
त्याच्या बुडाचं कैचन कुणी काढलं का बाई ?
जया ओसरी ना वटा नाही अंगणात झाड
अशा घरादारामंदी सुख नांदल का बाई ?
पान फुलं फळं आणि जन्मभर शुद्ध हवा,
झाड सोयरा म्हणाला ‘तुका’ वाचलं का बाई ?
▪कविसंमेलनाचा समारोप ज्ञानदेव वाकुरे यांनी स.ग.पायपोळ यांची कविता
‘हंबरुनी वासराला चाटते जवा गाय’ ऐकवून उपस्थितांना आई आणि लेकरांच्या वात्सल्याचा परीचय करुन दिला.
कै बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती समारोहाचा आरंभीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे परभणी, जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काका, महाराष्ट्र राज्य दंत परीषदेचे अध्यक्ष तथा बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचीव डॉ. नरेंद्र काळे, मानवलोक अंबाजोगाईचे कार्यवाह अभिजीत लोहिया ,प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी, विश्वस्तांसह प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे आणि त्यांचं गोणगोत उपस्थित होते.
कविसंमेलनासाठी उत्सफुर्तपणे उंदरी आणि परीसरातील ठोंबरे परिवाराचं अवघं गणगोत आणि उंदरीचे ग्रामस्थ उपस्थीत होते.महिला आणि तरुणांसह बुजुर्गांनीही या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय शेती मातीच्या आणि एकुणच संस्कृती संवर्धनाला समर्पीत कविसंमेलनाचा आस्वाद घेतला.
