जाणीवपूर्वक जुन्या कर्मचाऱ्यांना पदमान्यतेच्या वेळी डावलले ; न्याय मिळावा यामागणीसाठी जिल्हाधिकारी यांना दिले लेखी निवेदन
हरीओम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतील प्रकरण
केज/ प्रतिनिधी
समाजकल्याण अधिकारी बीड आणी हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ नेकनूर अंतर्गत आदर्श मतिमंद विद्यालय नांदूर फाटा या संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून पद मान्यतेच्या वेळी या शाळेतील काही जुन्या कर्मचाऱ्यांना डावलले म्हणून जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे जुन्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,आदर्श मतिमंद निवासी विद्यालय या शाळेचे जुने कर्मचारी तात्या गवळी,मीरा खरात, गणेश घोडके,संतोष जाधव, विलास जाधव, अशोक उघडे, लता नालपे, रविराज माने, ओमप्रकाश भोगे, संतोष कदम,गोविंद सुळ हे कर्मचारी वरील शाळेवर गेले अनेक दिवसापासून कार्यरत होते.परंतु जुने कर्मचारी शाळेवर असताना देखील संस्थापक अध्यक्ष सचिव यांनी नवीन कर्मचारी भरती करून नवे कर्मचारी शाळेवर घेतले त्याबाबत सन २०१७-२०१८ पासून जिल्हाधिकारी बीड, समाज कल्याणअधिकारी बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,अपंग समाज कल्याण आयुक्त पुणे,सामाजिक न्याय मंत्री यांच्या कार्यालयासह इतर संबंधित कार्यालय जुन्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार करून व प्रत्यक्षात भेटून संबंधित संस्थेकडून आमची फसवणूक झाल्याबाबतच्या तक्रारी केल्या परंतु जुन्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना आजपर्यंत कसल्याच प्रकारचा संबंधित कार्यालयाकडून न्याय मिळाला नाही.दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजी काही अन्यायग्रस्त कर्मचारी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषणास बसले असता समाजकल्याण अधिकारी बीड यांनी दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी पत्र दिले होते.त्या पत्रात जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी म्हटले होते की, संस्थेतील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांवर पद मंजुरीच्या वेळी अन्याय होणार नाही याची दक्षता या कार्यालयाकडून घेण्यात येईल.परंतु पद मान्यतेच्या वेळी समाज कल्याण अधिकारी बीड यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना कसल्याच प्रकारचा न्याय दिला नसल्याचे जुण्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
जुन्या कर्मचाऱ्यांनी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी बीड, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री बीड,अपंग समाजकल्याण आयुक्त पुणे,प्रादेशिकउपआयुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद,मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,सहाय्यक धर्मादाय बीड,समाज कल्याण अधिकारी बीड,एस.पी. बीड,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नेकनूर यांना लेखी निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे.
समाजकल्याण अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी काही अन्याय ग्रस्त जुने कर्मचारी भेटले असता सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत.
सन २०१७-१८ पासून आम्हाला न्याय मिळत नाही. पुढे निवेदनात अन्यायग्रस्त कर्मचारी यांनी म्हटले की, आपल्या मार्गदर्शनाखाली एक उच्च समिती गठीत करून सदरील प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करून सर्व अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा असे म्हटले आहे.
वरील सर्व कर्मचारी यांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत.